दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर १० मिनिटे वेळ वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली आहे. तसेच यासंदर्भातील सुधारित वेळाही जाहीर करण्यात आल्या आहेत.
समाजमाध्यमांवर होणाऱ्या पेपरफुटीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी आणि कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पडण्यासाठी आता परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी १० मिनिटे आधी विद्यार्थ्यांच्या हाती प्रश्नपत्रिका वितरित करण्याची सुविधा फेब्रुवारी-मार्च २०२३ पासून रद्द करण्यात आली आहे. विद्यार्थी हित लक्षात घेऊन व पालक विद्यार्थी यांच्या मागणीचा विचार करून दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षेत प्रत्येक पेपरच्या निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटांचा वेळ परीक्षेसाठी वाढून मिळणार आहे.
माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षा २१ फेब्रुवारीपासून, तर दहावीच्या परीक्षा २ मार्चपासून सुरू होत आहेत. दहावी-बारावी हा विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक महत्त्वपूर्ण टप्पा असल्यामुळे पालक आणि समाजघटक या परीक्षांकडे लक्ष देऊन असतात. विद्यार्थ्यांचा परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी १० मिनिटेआधी प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका गेल्या पाच-सहा वर्षांपासून देण्यात येत होती.
गैरप्रकार टाळण्यासाठी निर्णय
प्रश्नपत्रिका मोबाईलवर तसेच समाजमाध्यमातून व्हायरल झाल्याचे प्रकार, अफवा अशा घटनाही परीक्षेच्या काळात निदर्शनास आलेल्या आहेत. त्यामुळे पेपरफुटीच्या अशा अफवांमुळे परीक्षार्थींचे नुकसान होते, त्यांच्या मनात संभ्रम निर्माण होतो. पेपरफुटीच्या घटनांना आळा बसावा, परीक्षा निकोप, भयमुक्त व कॉपीमुक्त वातावरणात सुरळीत पार पडाव्यात यासाठी परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका वितरित करण्याची सुविधा फेब्रुवारी-मार्च २०२३ परीक्षेपासून रद्द करण्यात येत आहे, असे अनुराधा ओक यांनी म्हटले आहे.