डोंबिवली (शंकर जाधव)
डोंबिवलीतील खराब रस्ते हा विषय नागरिकांसाठी गंभीर बनत चालला असून गुरुवारी रात्री 8 वाजता नागरिकांनी रस्त्यावर उतरून घंटानाद करत थाळ्या वाजविल्या. प्रशासनाला जागे करणे हे आमचे दुर्भाग्य असल्याचे सांगितले. करदात्या नागरिकांचे पैसे वाया कशाला घालवितात असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला. डोंबिवली शहराच्या या दुरवस्थेबाबत जागरूक नागरिकांनी थेट पंतप्रधान कार्यालयाला लेखी तक्रार केली असून यावर कार्यालयाकडून विचारणा झाल्याचेही जागरूक नागरिक अक्षय फाटक यांनी सांगितले.
डोंबिवली पूर्वेकडील आप्पा दातार चौकात त्रस्त नागरिकांनी घंटानाद व थाळ्या वाजवल्या. नागरिकांनी केलेल्या आंदोलनात महिलाही सहभागी झाल्या होत्या. हे आंदोलन राजकीय पक्षांकडून नव्हे तर सामान्य नागरिकांचे केले असून यातून तरी सरकारने लक्ष दिले पाहिजे अशी जोरदार मागणी करण्यात आली. मिलापनगर येथील अध्यक्षा वर्षा महाडिक म्हणाल्या, काही दिवसांपूर्वी घरडा सर्कलजवळ दुचाकीवरून पडल्याने जखमी झाल्याचे सांगितले. वर्षानुवर्षे तेच ठेकेदार रस्त्याची कामे का दिली जातात ? लोकप्रतिनिधी कमी पडत असून शिकलेला चांगला उमेदवार निवडणुकीत का उभा राहत नाही असा प्रश्न उपस्थित केला. अक्षय फाटक यांनी हे आंदोलन प्रशासनाला जागे करण्यासाठी केले असल्याचे सांगितले.
आंदोलन मीडियावर घसरले
मीडियाला बाईट देऊ नका…इतकी वर्षे मीडिया झोपली होती का ? असा प्रश्न उपस्थित करत आंदोलनकर्त्यापैकी एक जण मीडियावर घसरला. यावर उपस्थित पत्रकारांनी आक्षेप घेताच आंदोलनकर्त्यांनी दिलगिरी व्यक्त केली.
ब्लॅकआउट झालाच नाही
ब्लॅकआउट करण्याचे आवाहन आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आले. मात्र याला कोणीही प्रतिसाद दिला नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते.