डोंबिवली ( शंकर जाधव ) :- वसई किल्ला विजयातील हुतात्मा डोंबिवलीकर आन ठाकूर – मान ठाकूर बंधूंचा २८४ व्यां स्मृतिदिन त्यांची आठवण नेहमीच स्मरणात रहवी म्हणून आपण दर वर्षी जुनी डोंबिवली ग्रामस्थ आणि समस्त डोंबिवलीकरां कडून विविध उपक्रम राबविले जातात,त्या निमित्ताने ३ मे रोजी त्यांच्या स्मृती दिना निमित्ताने कुषाळकर उद्यान मध्ये ज्येष्ठ नागरिकांना तुळस वाटप करून साजरा करण्यात आला.
जीवनाच्या विविध क्षेत्रात आपल्या कर्तुत्वाचा ठसा जनमानसावर सहजपणे उमटविणारे डोंबिवलीकर हा नेहमीच एक आदराचा, कौतुकाचा विषय राहिला आहे.
स्वातंत्र्यलढ्यातील वसई विजयाचे एक लखलखीत सोनेरी पान हेही डोंबिवलीकरांचे एक वैशिष्ट्य म्हणून ऐतिहासिक महत्वाला पात्र ठरले आहे. वसईचा संग्राम म्हणून प्रसिद्धी पावलेली ही लढाई अशीच राष्ट्रीय महत्वाची आहे.ज्यांच्या ताब्यात समुद्र त्याच्या ताब्यात सत्ता हे छत्रपती शिवरायांचं तत्व निधड्या छातीच्या छत्रपती संभाजी महाराजांनी पुरेपुर जाणलं होतं. तद्वतच त्यानंतरच्या काळात छत्रपती शाहू महाराजांनी अद्वितीय सेनानी थोरले भाजीराव पेशव्यांच्या मदतीने पोर्तुगीजांच्या रयतेवरील अनन्वित अत्याचारांचा समाचार घेताना पेशव्यांचेच धाकटे बंधू शूरवीर सेनानी चिमाजीआप्पांच्या नेतृत्वाखाली वसईचा किल्ला जिंकण्याची मोहीम हाती घेतली आणि २६ नोव्हेंबर १७३८ या दिवशी चिमाजीआप्पा वसईच्या रोखाने निघाले.

वसईत घनघोर संग्राम सुरु झाला. वसईचा अभेद्य किल्ला जिंकणे कठीण होऊ लागले. अशात १७३९ चा एप्रिल महिना उजाडला. त्यावेळी डोंबिवलीचे कांही मान्यवर पाटील, चिमाजीआप्पांना भेटले व किल्ला सर करायचा तर सुरुंग पेरल्याशिवाय गत्यंतर नसल्याचे त्यांना पटवून दिले. हे कठीण काम करण्यात आमचे डोंबिवलीचे दोन जिगरी तरुण निष्णात असल्याने त्यांचेवर निर्धास्तपणे ही कामगिरी सोपवावी असा जणू आग्रहच धरला, ते बहाद्दर म्हणजे आन ठाकूर व मान ठाकूर हे सख्खे बंधू, चिमाजीआप्पांनी या तरुणांशी मसलत करून सैन्य सिद्ध केले आणि २ मे च्या मध्यरात्री सुरुंग लावण्याचे ठरविले. त्या रात्री दोघा वीर बंधूंनी खाडीतून पोहत जात बुरुजाचे चिरे फोडून सुरुंगाचे साहित्य आत बसविले आणि ३ मे च्या पहाटे सुरुंग उडवण्याचे ठरले.चिमाजींनी या दोघा २०-२२ वर्षांच्या या बंधूंना स्वतःला जपण्याविषयी कळकळीने सांगितले. ३ मे ची पहाट उजाडली मात्र आणि वसईच्या अभेद्य बुरुजाला लावलेले सुरुंग धडाधडा उडाले. मराठी सैन्य आत घुसले. दोन्हीकडचे कडवे शूरवीर पडले. त्यातच दुदैवाने हे दोघेही डोंबिवलीकर बंधू, सुरुंग उडवतांना हुतात्मा झाले.

१२ मे १७३९ ला मराठी सैन्य “हर हर महादेवचा जयघोष करीत किल्ल्यात गेले आणि पोर्तुगीजांचा झेंडा उतरवून भगवा किल्ल्यावर फडकवला. यानंतर चिमाजींनी आपल्या अधिकाऱ्यांना डोंबिवलीला या हुतात्मा बंधूंच्या घरी सांत्वनासाठी पाठवले, त्यांना वतन-वाडी दिली. या दोघा बंधूच्या बलिदानानेच वसईचा विजय दृष्टीस पडला, असा या डोंबिवलीकर मृत्युंजय सुपुत्रांच्या बलिदानाचे हे २८५ वे वर्ष आपण अभिमानाने साजरे करु या.अश्या प्रकारे शुर वीर आन ठाकूर आणि शुर वीर मान ठाकूर बंधूंची शौर्य गाथा त्यांचे वारस जगदीश गौरीबाई जगन्नाथ ठाकूर ह्यांनी उपस्थितांना दिली. यावेळी समीर भोईर,श्री राजेंद्र नांदोस्कर, निरंजन भोसले, महेश निंबाळकर उपस्थित होते.