महाराष्ट्राच्या (Maharashtra) राजकारणात गेल्या दहा-बारा दिवसांत राजकीय नाट्य घडत असतानाच गुरूवारी भाजपने (BJP) आणखी एक धक्का दिला. भाजप, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गट आणि १६ छोटे पक्ष व अपक्ष असे मिळून नवे सरकार स्थापन झाले. एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री नवे मुख्यमंत्री असतील, अशी घोषणा करत भाजपचे विधिमंडळ नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी आश्चर्याचा धक्का दिला. त्याचबरोबर आपण या मंत्रीमंडळात सहभागी होणार नसल्याचे सांगून त्यांची दुसरा धक्का दिला. नव्या मंत्रीमंडळात शिवसेनेच्या बंडखोर गटाचे सदस्य, अपक्ष आणि भाजपचे आमदार असतील, असे फडणवीस यांनी पत्रकार बैठकीत जाहीर केले.
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर गुरूवारी सकाळी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेउन सरकार स्थापनेचा दावा केला. तोपर्यंत देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील, असे सगळ्यांना वाटत होते; मात्र राजभवन येथेच झालेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी मास्टरस्ट्रोक देत राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा केली, आणि स्वतः उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.