जम्मू-काश्मीर पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्याने हादरले आहे. राष्ट्रीय रायफल्सच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या ट्रकवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. त्यामुळे ट्रकने पेट घेतला. यात पाच जवान शहीद झाले असून एक जवान जखमी झाला आहे. पुंछ जिल्ह्यातील भींबर गली ते संगिओत येथे दुपारी तीनच्या सुमारास हा हल्ला झाला. दरम्यान, लष्कराने युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू केली आहे.
भारतीय लष्कराने शहीद जवानांची नावे जाहीर केली आहेत. दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पाच जवानांमध्ये कॉन्स्टेबल मनदीप सिंग, लान्स नाईक देबाशिष बसवाल, लान्स नाईक कुलवंत सिंग, शिपाई हरकृष्ण सिंग आणि शिपाई सेवक सिंग यांचा समावेश आहे.हे सैनिक राष्ट्रीय रायफल युनिटमध्ये तैनात होते आणि दहशतवादविरोधी ऑपरेशनमध्ये कार्यरत होते. दहशतवाद्यांनी जवानाच्या वाहनावर हल्ला केल्याची घटना राजौरी सेक्टरमध्ये घडली. या हल्ल्यात पाच जवान शहीद झाले असून एक जखमी झाला आहे. हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना पकडण्यासाठी ऑपरेशन सुरू करण्यात आले, मात्र हल्लेखोरांचा तपशील अद्याप सापडलेला नाही.
मुसळधार पावसामुळे कमी दृश्यमानतेचा फायदा घेत अज्ञात हल्लेखोरांनी हा हल्ला केल्याचे लष्कराने म्हटले आहे. दहशतवाद्यांच्या संभाव्य ग्रेनेड हल्ल्यामुळे लष्कराच्या ट्रकला आग लागली. वृत्तानुसार, जैशच्या PAFF ने या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. PAFF चे प्रवक्ते तन्वीर अहमद राथेर यांनी एका निवेदनात हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. जम्मू-काश्मीरमधील जी-20 बैठकीला लक्ष्य केले जाईल, अशी धमकीही त्यांनी दिली.