डोंबिवली (शंकर जाधव): राज्यातील नागरी स्वराज्य संस्थामध्ये शहर सौंदर्यीकरण अभियान राबविण्यासाठी, “शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धा-२०२२” आयोजित करणेबाबत माहे सप्टेंबर २०२२ अन्वये शासनाने शासन निर्णय पारित केला होता. या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या शहरांचे गुणानूक्रम ठरविण्यासाठी सुंदर जलाशय, सुंदर हिरवे पट्टे, सुंदर पर्यटन स्थळ/वारसा स्थळ, सुंदर बाजार/व्यावसायिक ठिकाण या बाबींच्या अनुषंगाने केलेल्या कामाचे सादरीकरण तद्अनुषंगिक माहितीसह सादर करणेबाबत शासनाने कळविले होते.
त्यानुसार कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने देखील या ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसा लाभलेल्या नगरीमध्ये महापालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली कायापालट अभियान राबविण्यास सुरुवात केली आणि त्यामुळे कल्याण डोंबिवली नगरीने ख-या अर्थाने कात टाकण्यास सुरुवात केली.
महापालिकेने शहरातील रस्ते व त्यामधील वाहतुक बेटे यांचे सौंदर्यीकरण केले. शहरातील विविध शाळा, सरकारी कार्यालये/निवास स्थाने, खाजगी मिळकतींच्या वाडेभिंतींवर जे.जे.कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमार्फत सुंदर चित्रे रंगवून या भिंतींचे रुपडे नेत्रसुखद केले. शहराचा सांस्कृतिक वारसा जपतानाच महापालिका शाळांतील शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी नववर्ष दिनी “गुढीपाडवा शाळा प्रवेश वाढवा” ही संकल्पना गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी राबविण्यास सुरुवात केली. आंबिवली येथील उजाड टेकडीवर १५ हजार पेक्षा जास्त वृक्षांची लागवड करुन या टेकडीचे एका निसर्गरम्य स्थळात/ऑक्सीजन झोनमध्ये रुपांतर केले. कल्याण मधील सर्वात जुना शेनाळे तलाव/प्रबोधनकार ठाकरे सरोवराचे संपूर्ण कायापालट करुन सुशोभिकरण करण्यात आले. इतकेच नव्हे तर खाडीकिनारी ठिकठिकाणी असलेल्या दगडांवर/शिळांवर मनोहारी चित्रे रेखाटण्यात आली. त्याचप्रमाणे शहरातील इतर तलावांचे देखील सुशोभिकरण करण्यात येत आहे. शहराचा ऐतिहासिक वारसा जपण्याच्या दृष्टीकोनातून स्मार्ट सिटी मार्फत उल्हास नदी किना-या लगत नौदल गॅलरीसह अडीच कि.मी. लांबीचा रिव्हर फ्रंन्ट विकसीत करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे कल्याण खाडी किनारी गणेश घाट येथे भारतीय नौदलामार्फत प्राप्त झालेली युध्द नौका नागरीकांच्या माहितीसाठी ठेवण्यात आली आहे. रस्ते दुभाजकांवरील रंगरंगोटी हरित पट्टयांचा विकास याप्रमाणे कल्याण डोंबिवली नगरीचा कायापालट करण्याच्या महापालिकेच्या प्रयत्नांचा परिपाक म्हणूनच या शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धा – २०२२ मध्ये शासनाच्या समितीने महापालिकेस दुस-या क्रमांकाचे पारितोषिक आज जाहिर केले.
कोव्हीड इन्होवेशन पुरस्कार, ऊर्जा संवर्धन पुरस्कार, गतर्षींचा फ्रिडम टू वॉक या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार, वाचन प्रेरणा दिनानिमित्त प्राप्त झालेल्या द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार आणि कालच जाहिर झालेला “FREEDOM TO WALK, CYCLE AND RUN CAMPAIGN” या स्पर्धेतील केंद्र शासन स्तरावरील द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार या पुरस्कारांच्या दैदीप्यमान यशानंतर महापालिकेने पुन्हा एकदा शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धा-२०२२ मध्ये रू.१० कोटी रक्कमेचा द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार पटकावून उज्वल व झळझळीत यशाची आपली परंपरा कायम ठेवली आहे.
या पुरस्कारासाठी सर्व लोक प्रतिनिधी, महापालिका शहर अभियंता अर्जुन अहिरे, महापालिका सचिव संजय जाधव, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अतुल पाटील, कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत तसेच,उमेश यमगर इतर अधिकारी/कर्मचारी वर्ग त्याचप्रमाणे क्रेडाई एमसीएचआय ,पर्यावरण दक्षता मंडळ, सोलस इंडिया ऑनलाईन, सहयोग सामाजिक संस्था, निर्मल युथ फाऊंडेशन, श्रीमती चंदामाता सेवा संस्था, ऊर्जा फाऊडेशन तसेच इतर स्वयंसेवी संस्था, , इंडियन मेडिकल असोसिएशन, महापालिका क्षेत्रातील सर्व रुग्णालये, विविध शिक्षण संस्थांमधील एनएसएस ग्रुप व नागरिक यांचा सहभाग मोलाचा आहे.