केंद्र सरकारने दिलेल्या निर्णयानुसार १ जुलै २०२२ पासून प्लास्टिकवर बंदी घातली आहे. प्लास्टिक पासून बनवलेल्या अश्या वस्तू ज्या आपण केवळ एकदाच वापरतो त्यावर आता पूर्णपणे बंदी घातली आहे. पर्यावरण कायदा कलम १५ अंतर्गत बंदी केलेल्या उत्पादनाची निर्मिती केल्यास किंवा विक्रीसाठी ठेवल्यास ७ वर्षाचा तुरुंगवास व १ लाख रुपयांपर्यंत दंड बसेल.
प्लास्टिक हे देशात होणाऱ्या प्रदूषणाचे मोठे कारण बनले आहे. केंद्र सरकारच्या अहवालानुसार, देशात २०१८-१९ मध्ये ३०. ५९ लक्ष टनहून अधिक एकल प्लास्टिक कचरा निर्माण झाला आहे. एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लॅस्टिकपासून बनवलेल्या वस्तूंची पुनः निर्मिती करता येत नाही किंवा त्या जाळता देखील येत नाही. ते प्लॅस्टिक जाळल्यास हानिकारक वायू बाहेर पडतो जो पर्यावरणास हानिकारक ठरतो.
कोणत्या वस्तूंवर बंदी
प्लास्टिक स्टिक असणारे इअर बड्स,कॅरी बॅग (७५ मायक्रोनपेक्षा कमी जाड), आईसक्रीम स्टिक,प्लास्टिक कप,ग्लास,प्लेट,स्ट्रॉ,फुग्यांसाठी वापरल्या जाणार्या प्लास्टिकच्या काड्या, प्लास्टिकचे झेंडे, कँडी स्टिक्स,मिठाईसाठीचे प्लास्टिकचे बॉक्स, निमंत्रण पत्रिका, सिगारेटचे पॅक, 100 मायक्रॉनपेक्षा कमी आकाराचे प्लास्टिक किंवा पीव्हीसी बॅनर, स्टिरर (साखर किंवा इतर धान्य) इत्यादी गोष्टींवर बंदी घातली आहे.
प्लास्टिकला पर्याय
प्लॅस्टिकच्या वापरावर बंदी घातल्यामुळे प्रश्न असा कि त्याला दुसरा पर्याय काय ? एकदाच वापरात येणाऱ्या प्लास्टिक च्या वस्तूंना वेगवेगळे पर्याय असू शकतात जसे, प्लास्टिक च्या स्ट्रॉ ऐवजी कागदी स्ट्रॉ,बांबूपासून बनवलेल्या आईसक्रीम च्या काड्या, कापडापासून बनवलेले झेंडे,मातीची भांडी इत्यादी.