गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्यात कमी- जास्त प्रमाणात पाऊस (Rain Update) पडत आहे. देशाच्या काही भागात पावसाने जनजीवन विस्कळीत केले आहे. तर काही भागात पावसाने नदी नाले भरून वाहत आहेत. हवामान खात्याने वर्तवल्यानुसार मुंबईसह कोकण किनारपट्टीवर मुसळधार पावसाची आज शक्यता आहे. या भागात सकाळी काही तास मुसळधार पावसाची शक्यता आहे.
मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर परिसरात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे पुणे हवामान विभागाचे प्रमुख केएस होसाळीकर यांनी ट्विट केले आहे. उपग्रह आणि रडारच्या ताज्या निरीक्षणानुसार मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच मंगळवारपासून तीन दिवस मुंबई आणि ठाण्यात मुसळधार पावसाचा अंदाज देखील हवामान खात्याने वर्तवला होता.
तसेच कोल्हापूर,हिंगोली,नाशिक या शहरात देखील जोरदार पाऊस सुरु आहे. कोल्हापूर येथील पंचगंगा नदीची पातळी वाढली असून इतर नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे नद्यांजवळील गावांना जिल्ह्याधिकारी कार्यालयाकडून स्थलांतर करण्याचा आदेश आला आहे. तर हिंगोलीमध्ये अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून जनावरे मृत्युमुखी पडले.
हवामान खात्याने पाच जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी केला आहे. यामध्ये पालघर, रायगड, नाशिक, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांचा समावेश आहे. धुळे, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, अमरावती, भंडारा, बुलडाणा, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाटांना मुसळधार पावसाने घेरले आहे. त्यामुळे पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.