डोंबिवली (शंकर जाधव) कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेला स्मार्ट सिटीचा दर्जा मिळाला असला असला तरी येथील नागरिकांची रस्तातील खड्डे आणि पाणी टंचाईतून मुक्तता झाली नाही.२७ गावातील पाणी प्रश्न सोडविण्यासा पालिका प्रशासनाला यश आले नसल्याने आजही नागरिकांची पाण्यासाठी वणवण संपली नाही.डोंबिवली जवळील दावडीमधील अनेक भागात गेली वर्षभर पाण्याची समस्या असल्याने येथील रहिवाश्यांना पाण्याचे टॅकर मागवावे लागतात.याची दाखल घेत मनसे कार्यकर्ता शिबू शेख यांनी आवाज उठवला.पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता शैलेश कुलकर्णी यांना निवेदन दिले.
दावडी मधील मधुकर गॅलेकसी, शारदानगर, तुकाराम चौक व अन्य अनेक परिसरात गेली वर्षभर कमी दाबाने पाणी पुरवठा केला जात आहे. दावडी मधील लोकसंख्या व इमारती च्या तुलनेने पाणी पुरवठा कमी होत असल्याने येथील नागरिक प्रचंड संतापलेले आहेत. पाणी टॅकर मागविले जात प्रत्येक घरी हजार रुपये खर्च होत असतो.याबाबत येथील नागरिकांनी मनसे कार्यकर्ताशिबू शेख यांची भेट घेऊन आपले म्हणणे मांडले. शेख यांनी पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता कुलकर्णी यांना निवेदन दिले.पाणी मिळणे हा आमचा हक्क असून पालिका प्रशासना इतकी वर्ष का कमी पडली याचा जाब शेख यांनी विचारला. यावर कुलकर्णी यांनी दावडी गावातील व आजूबाजूच्या परिसरातील अनधिकृत नळजोडणी शोधून ते तोडले जाईल असे आश्वासन शेख यांना दिले.तसेच दावडी मधील पाण्याची समस्या कायमस्वरूपी मिटण्यासाठी पाण्याच्या टाकीचे काम लवकरच पूर्ण होईल असेहि कुलकर्णी यांनी सांगितले.
दरम्यान दावडी आणि अनेक गावात पाणी समस्या मिटली नसून अनेक वेळेला नागरिकांनी डोंबिवली एमआयडीसी कार्यालयावर आणि पालिका कार्यालयावर मोर्चे काढले.उपोषण करूनही आश्वासन खेरीज नागरिकांच्या पदरात काहीच पडले नाही. पालिकेला पाणीपुरवठा करणारे बारवी धरण १०० टक्के भरले असताना नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.२७ गावातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी पालिका आयुक्त भाऊसाहेब दांडगे एमआयडीसी अधिकारी आणि पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाची एकत्रित बैठक घेऊन यावर तोडगा काढणे आवश्यक असल्याचे मनसे कार्यकर्ता शिबू शेख यांनी सांगितले.
अनधिकृत नळजोडणी तोडणार ?
कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत अनधिकृत बांधकाम आणि अनधिकृत नळजोडणी हा विषय गंभीर आहे. अनधिकृत नळजोडणी तोडण्यास पालिका प्रशासन कमी पडल्याची वास्तविकता नाकारता येत नाही. दावडी गावतील अनधिकृत नळजोडणी तोडण्याची कारवाई प्रशासनाकडून होत नसल्याने यावर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.