राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असले तरी त्याचा परिणाम विकासकामांवर होताना दिसत नाही. सध्या अनेक शहरांमध्ये मेट्रोचे काम सुरू आहे. ठाण्यातील मेट्रो 4 चे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ओवळा सिग्नल आणि सीएनजी पंप येथील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले आहेत. खारेगाव, माणकोली टोल रोड, कापूरबावडी जंक्शन परिसरात 10 ऑगस्टपर्यंत अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून, ज्या ठिकाणी जास्त रहदारी असते त्या ठिकाणी वाहतूक विभागाचे कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. यासोबतच वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
मेट्रोच्या कामात कोणताही अडथळा किंवा अपघात होऊ नये म्हणून घोडबंदर रोडवरील वाहतूक आता वळवण्यात आली आहे. या मार्गावर २४ तास वाहतूक असते. याच मार्गावर माजिवडा नाका, कापूरबावडी जंक्शन येथे सतत जाम होत असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मेट्रोचे काम सुरू होण्यासाठी पुन्हा वाहतूक बदलण्याची गरज आहे.
मुंबई-नाशिक महामार्गावरून घोडबंदरकडे जाणाऱ्या वाहनांना कापूरबावडी जंक्शनमध्ये जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. याला पर्याय म्हणून मुंबई-ठाण्याकडून घोडबंदरकडे जाणाऱ्या अवजड वाहनांना कापूरबावडी वाहतूक शाखेजवळ मार्गस्थ करण्यात येणार आहे. त्यामुळे खारेगाव, टोलनाका, माणकोली, अंजूफाटीकडे जाणाऱ्या वाहनांचा मार्ग सुरळीत होणार आहे. घोडबंदरकडे जाणारी वाहने कापूबावडी जंक्शनवरून कशेरी, अंजूरफाटा मार्गे सोडण्यात येणार असून, नाशिकहून घोडबंदरच्या दिशेने येणाऱ्या जड वाहनांना बंदी असेल. ही वाहने माणकोली पुलाखालून जाऊ शकतील.
मुंब्रा, कळवा ते घोडबंदरकडे जाणाऱ्या अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे ही वाहने गॅमन मार्गे खारेगाव खाडी ब्रिजखालून खारेगाव टोलनाका, माणकोली मार्गे मार्गस्थ होऊ शकतात.