आजच्या धावत्या जगात सततची धावपळ, दगदग, कामे अनियमित किंवा अपुरी झोप यामुळे थकवा जाणवत असतो. कधीकधी हा थकवा इतका जास्त असतो की फक्त आराम केल्याने तो जात नाही. तज्ञांचे म्हणणे आहे की, आजारपण दगदग, अति काम, अपूर्ण झोप यामुळे थकवा येतो, तो सहा महिन्यांपेक्षा कमी काळ राहतो आणि विश्रांती घेतली की जातो. परंतु तीव्र थकवा ठराविक कारणाशिवाय होतो. तो सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ राहतो. मानस शास्त्रांमध्ये हा वारंवार थकवा क्रॉनिक फॅटीग सिंड्रोम शी संबंधित आहे असे म्हटले जाते.
थकव्याची कारणे किंवा लक्षणे-
- मानसिक ताण ,निराशा चिंता.
- आजारपण, तीव्र वेदना, शस्त्रक्रिया, थायरॉईड, इत्यादी.
- अयोग्य आहार, आहाराशी निगडित चुकीच्या सवयी.
- झोपेत अडथळा इत्यादी.
- उपाय-
थकवा हा शाररीक व मानसिक असतो. वैद्यकीय उपचारांनी यावर उपाय करता येतात, परंतु योग्य आहार घेणे हेसुद्धा तितकेच आवश्यक असते. योग्य आहार हा रोजच्या जीवनातील महत्त्वाचा भाग आहे. योग्य व पोषक आहाराचा आपल्या मेंदूवर, मनावर देखील चांगला परिणाम होत असतो. आपल्या निरोगी आरोग्यासाठी ते महत्त्वाचे असते. अलीकडे जंक फूड खूप मोठ्या प्रमाणात खाल्ले जाते, विशेषतः तरुण वयातील लोकांचे जंक फूड खाण्याचे प्रमाण वाढले आहे.
जेवणावर आपल्या शरीराची शक्ती केंद्रित असते.लोहयुक्त, मॅग्नेशियम, पोटॅशियम, विटामिन बी असलेल्या अन्नातून ताकद मिळते. फळे, पालेभाज्या यांचा समावेश कायम आहारात असावा.कॉफी, चॉकलेट अल्कोहोल, मांस यांचे अतिसेवन करू नये. नेहमी उत्साही राहण्यासाठी खनिजांचा सुद्धा वापर असणे आवश्यक आहे. त्यासाठी बदाम, मनुके शेंगदाणे, कडधान्ये अशा पदार्थांचा देखील आहारात समावेश असावा. शक्यतो बाहेरचे फास्टफूड टाळावे. तळलेले, तुपकट, अति तिखट, खारट इत्यादी खाणे टाळावे.
तसेच थकवा घालवण्यासाठी नियमित व्यायाम करणे देखील गरजेचे आहे. किमान आठ तास झोप घेतल्याने उठल्यावर तजेलदार वाटते, थंड पाण्याने अंघोळ केल्यानंतर फ्रेश वाटते, ताजी हवा घेण्यासाठी सकाळी मोकळ्या हवेत फिरायला जा.
तुम्हाला जर थकवा जाणवत असेल तर वरील दिलेल्या गोष्टींकडे नक्की लक्ष द्या. त्या आमलात आणा. योग्य उपचार घ्या. कारण रोजच्या जीवनात आनंदी व उत्साही राहणे अत्यंत गरजेचे आहे, तरच मन व शरीर निरोगी राहील.