एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटातील बंडखोर आमदार उदय सामंत (Uday Samant) यांच्या कारवर (Car) मंगळवारी रात्री कात्रज चौकात (Katraj Chawk) शिवसैनिकांनी हल्ला केला. या दगडफेकीच्या हल्ल्यात सामंत यांच्या कारची काच फुटली. सामंत कात्रज चौकातून कारने जात होते त्यावेळी शिवसैनिकांनी (Shivsena) घोषणाबाजी केली आणि सामंत यांची कार अडवून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी एकाने सामंत यांच्या कारवर दगड फेकल्याने गाडीची काच फुटली. सामंत यांच्या कारवर हल्ला झाल्याचे समजताच पोलीस त्वरित घटनास्थळी पोहोचले. शिवसैनिकांनी सामंत यांच्या कारला घेराव घालण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांनी (Police) तातडीने सामंत यांच्या कारला वाट करुन दिली. या सबंध घटनेमुळे कात्रज चौकात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कात्रज भागात एका कार्यक्रमासाठी आले होते तेव्हा शिंदे यांच्यासह सामंत देखील तेथे आले होते, त्यावेळीच हा हल्ला करण्यात आला. मात्र आता या हल्ल्यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर सामंत यांनी थेट शिवसेनेला इशारा दिलाय.
या हल्ल्यानंतर त्यांनी पुण्यातील पोलीस आयुक्तांशी चर्चा केली. उदय सामंत यांची, त्यांच्या कारच्या चालकाची आणि खासगी सचीवाची वैद्यकीय चाचणी करण्यात आली आहे, अशी माहिती त्यांच्याकडून मिळाली.
“गद्दार म्हणता तरी शांत आहे. शिव्या घालता तरी शांत आहे. आई वडिलांना शिव्या घातल्यात तरी शांत आहे. लोकशाहीत विचार बदलला म्हणून काय ठार माराल. शांत आहे म्हणजे हतबल आणि असाह्य नाही. काळ ह्याला उत्तर आहे. अंत पाहू नका,” असं ट्विट उदय सामंत यांनी नुकत्याच घडलेल्या प्रकाराबद्दल केलं आहे.
गद्दार म्हणता तरी शांत आहे…शिव्या घालता तरी शांत आहे..आई वडिलांना शिव्या घातल्यात तरी शांत आहे..लोकशाहीत विचार बदलला म्हणून काय ठार माराल.. शांत आहे म्हणजे हतबल आणि असाह्य नाही..काळ ह्याला उत्तर आहे..अंत पाहू नका.. जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
— Uday Samant (@samant_uday) August 2, 2022
हल्लेखोरांचे चेहरे पाहिले का? असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा सामंत यांनी, “दोन ते तीन व्यक्ती होत्या. काळे आणि पांढरे कपडे घातलेले लोक होतं. सर्व काही सीटीटीव्हीमध्ये कैद झालं आहे,” असे उत्तर दिले. एखाद्याचा विचार पटला नाही तर ठार मारण्यासारखी टोकाची भूमिका घेणे काही योग्य नाही, असंही सामंत यांनी म्हटलं.