नवनीत बऱ्हाटे
उल्हासनगर (Ulhasnagar) शहरातील रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. हे खड्डे भरण्यात पालिका अयशस्वी ठरली असल्याने नागरिकांना आतोनात हाल सोसावे लागत आहेत. त्याचा निषेध नोंदविण्यासाठी रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये मासे पकडण्याचे प्रतीकात्मक आंदोलन उल्हासनगर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आले. उल्हासनगर शहरातील अनेक मुख्य रस्ते त्याचबरोबर अंतर्गत रस्ते पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये हरवलेले आहेत. कोट्यवधी रुपये खर्चून त्यांचे डांबरीकरण करण्यात आले आहे. मात्र अवघ्या एक आठवडा पडलेल्या पावसात अनेक रस्त्यांवर मोठ मोठे खड्डे पडले आहेत की त्यात पावसाचे पाणी साचून छोटी छोटी तळी तयार झाली आहेत. या खड्ड्यांमध्ये आदळून वाहने बंद पडत असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. खड्ड्यांमध्ये वाहने आदळून चिखल उडत असल्याने पादचाऱ्यांना रस्त्यावर चालणे कठीण झाले आहे.

यामुळे पालिका प्रशासनाच्या विरोधात उल्हासनगरवासियांच्या मनात रोष आहे. हीच बाब लक्षात घेऊन उल्हासनगर राष्ट्रवादी काँग्रेसने कॅम्प 5 मधील भाटिया चौक ह्या मुख्य रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यामध्ये मासे पकडण्याचे प्रतीकात्मक आंदोलन करीत प्रशासनाचे लक्ष वेधले. या आंदोलनात प्रवक्ते महेश तपासे, विकास सिंग, इम्रान खान, अजय गायकवाड, सुरेश गायकवाड, विनोद बाऱ्हे, गिता माऊटन, अनिल भंगाळे, प्रभाकर कडू, रणजित गायकवाड, गुलाब मगर आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते सामिल झाले होते.

रविवारी पावसानं काहीशी विश्रांती घेतली होती, मात्र तरी सुद्धा उल्हासनगर महापालिका प्रशासनाने रस्त्यांवर पडलेले खड्डे भरण्याची आवश्यकता होती. मात्र तसे न झाल्याने नागरिकांमध्ये प्रशासनाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यंनी संताप व्यक्त केला. हा रस्ता ज्या ठेकेदाराने बनवला त्याला काळ्या यादीत टाकण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे.