डोंबिवली ( शंकर जाधव ) – यावर्षी पावसाने प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडविल्याचे दिसते. काही दिवस पावसाने उसंत घेतल्यानंतर पालिकेने रस्त्यात पडलेले खड्डे बुजविले. मात्र पुन्हा पावसाने हजेरी लावण्याने प्रशासनाची पोलखोल करणारे काम खड्डेकाम जनतेसमोर आले. मनसेने आजवर पालिका प्रशासनाच्या ढकलपंची कामावर आंदोलने घेतली. आता प्रशासकीय राजवट लागल्याने सर्व अधिकार आयुक्तांना असल्याने त्यांनी रस्त्याची पाहणी केल्यास कामे चांगल्या दर्जाची कामे होतील आधी अपेक्षा मनसेने व्यक्त केली आहे. नवनियुक्त शहर अभियंता अर्जुन अहिरे यांनी शहराचे अवस्थेकडे लक्ष द्यावे अशी विंनती मनसे शहर अध्यक्ष मनोज घरत यांनी केला आहे.
डोंबिवलीतील रस्त्यावर पडलेले खड्डे आधी बुजवा असा पवित्रा रिक्षा चालक मालक युनियनचे पदाधिकारी शेखर जोशी यांनी घेतला होता. आमरण उपोषणाची इशाराही दिला होता. वास्तविक रस्ते बनविताना उत्कृष्ट दर्जाचे बनवणे बंधनकारक असते. मात्र शहर अभियंता लक्ष देत नसल्याने काही दिवसातच रस्त्यांची दुरावस्था होते. पावसाळ्यात रस्त्यात खड्डे पडत असल्याने नागरिक प्रशासनाच्या नावाने बोटे मोडतात. मनसेने आजवर प्रशासनाला जागे करण्यासाठी उलटे चालणे, डोंबिवली विभागीय कार्यालयातील उपायुक्तांच्या कार्यालयाबाहेर खडी टाकणे अशी आंदोलने केली होती. मनसे नेते तथा आमदार प्रमोद ( राजू ) पाटील यांनीही अनेकवेळेला विविध प्रश्नांवर प्रशासनाची कानउघडणी केली.
रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी अवस्था डोंबिवली शहराची झाली आहे. यावर राजकीय पक्षांकडून प्रशासनावर ताशेरे ओढले गेले. शहराच्या या अवस्थेवर मनसेचे डोंबिवली शहरअध्यक्ष मनोज घरत म्हणाले, मावळत्या शहर अभियंता सपना कोळी देवनपल्ली पालिकेच्या इतिहासातील सर्वांत अकार्यक्षम शहर अभियंता आहेत. रस्त्यांच्या दर्जाच्या बाबतीत डोंबिवलीला ५० वर्षे मागे नेऊन ठेवले इतकी भयावह अवस्था तब्बल २ वर्षे प्रशासकीय राजवट असतानाही त्यांच्या कारकिर्दीत झाली. डोंबिवलीच्या रस्ते आता तरी सुस्थितीत येतील अशी आशा आहे. नवनियुक्त शहर अभियंता अर्जुन अहिरे यांच्याकडुन मनसेला अपेक्षा आहेत.